टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे होणारे उपद्रव तसेच मानव-श्वान संघर्ष टाळण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने विशेष जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपक्रमांतर्गत महाविद्यालयाच्या सूचना फलकावर भटक्या जनावरांबाबत जनजागृतीपर छायाचित्रे, माहिती व संदेश प्रदर्शित करण्यात आले. या जनजागृती फलकाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या एम. सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, प्रा. डॉ. बी. एम. सपकाळ, ए. बी. सूर्यवंशी, ज्युनिअर विभागाचे श्री. बोरसे, डॉ. विशाल हौसे, डॉ. आर. आर. पाटील, प्राणीशास्त्र विभागप्रमुख व प्राणी जन्म नियंत्रण नोडल अधिकारी डॉ. एच. जी. सदाफुले, डॉ. मयूर सोनवणे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. एच. जी. सदाफुले यांनी प्रास्ताविकातून उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ. संध्या एम. सोनवणे यांनी विद्यार्थ्यांनी सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून अशा जनजागृती उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना माहितीपर पत्रकांचे (पॅम्प्लेट) वाटप करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील विविध विभागांमध्ये जनजागृती फलक लावून भटक्या जनावरांपासून सुरक्षित राहण्यासाठी घ्यावयाची काळजी, मानव-श्वान संघर्ष टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि जबाबदार नागरिक म्हणून विद्यार्थ्यांनी घ्यावयाची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मयूर एम. सोनवणे यांनी केले, तर आभार अदिती मोरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अश्विनी पवार, रामेश्वरी पाटील आणि भरत भालेराव यांचे सहकार्य लाभले.







