लोकप्रवाह, चोपडा दि. ३० जून – शहरातील स्टेट बँकेजवळील मे. अग्रवाल अॕग्रो एजंसी व हरेश्वर कॉलनी स्थित मे. राजप्रभा फर्टिलायझर या दोन कृषी केंद्रांच्या तपासणी दरम्यान त्यांनी खत नियंत्रण आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने जळगांव कृषी विभागामार्फत दोन्ही कृषी केंद्राचे परवाने निलंबीत करण्यात आले.
याबाबतीत सविस्तर वृत्त असे की, खत निरीक्षक तथा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक, जळगांव अरुण तायडे यांनी दि. १८/०६/२०२२ रोजी मे. राजप्रभा फर्टिलायझर व मे. अग्रवाल अॕग्रो एजंसी या विक्री केंद्रांची तपासणी केली असता दुकानात विक्रीस ठेवलेला सर्व उत्पादनांचा परवान्यात उगमप्रमाण पत्र समाविष्ठ नसणे, साठा रजिस्टर मध्ये नमूद केल्याप्रमाणे साठा न जुळणे, रासायनिक खत विक्रीचा मासिक अहवाल नोंदणी अधिकारी यांना सादर न करणे, मुदतीत खुलासा सादर न करणे तसेच रासायनिक खतांची कमाल विक्री दरापेक्षा जादा दराने विक्री करतांना आढळुन आल्याने जिल्हा गुणवत्ता निरीक्षक अरुण तायडे यांनी तसा प्रस्ताव जिल्हा कृषी कार्यालयास सादर केला.
त्यानंतर सदर कृषी केंद्रधारकांनी खत नियंत्रण आदेश १९८५ चे उल्लंघन केल्याचे तपासणीत आढळुन आल्याने दिनांक २४/०६/२०२२ रोजी सुनावणी आयोजीत करण्यात आली. सुनावणीच्या वेळी मे. राजप्रभा फर्टिलायझर या विक्री केंद्राचे संचालक दिपक युवराज जयस्वाल , मे. अग्रवाल अॕग्रो एजंसी चे संचालक सारंग रमेश अग्रवाल, जळगांव कृषी उपसंचालक अनिल भोकरे, मोहिम अधिकारी विजय पवार व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे आदिंची उपस्थिती होती.
सुनावणी वेळी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय तपासणी समितीने प्रस्तुत प्रकरणाबाबत चर्चा केली असता सदर विक्रेता यांनी खत नियंत्रण आदेश १९८५ चे खंड ३(३), ४, ५, २८ (१) (ए) व ३५ (१) (ए) (बी) चे उल्लंघन केले असल्याचे आढळुन आल्याने मे. राजप्रभा फर्टिलायझर व मे. अग्रवाल अॕग्रो एजंसी यांचा खत विक्री परवाना सात दिवसांकरीता म्हणजेच दि. २७/०६/२०२२ ते दि. ०३/०७/२०२२ पर्यंत निलंबीत करण्याचे आदेश परवाना अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी कडू ठाकुर यांनी केला आहे. तथापि या दोन्ही विक्री केंद्रांना निलंबन कालावधीत कोणत्याही प्रकारे खतांची साठवणुक तसेच विक्री न करण्याचे आदेश देण्यात आले आहे.








