टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळत आहे. या प्रकारामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
लोकप्रवाह न्यूजचे संपादक संदीप ब. ओली यांनी परिसरातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला असता, काही नागरिकांनी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या दरम्यान स्वामीनारायण मंदिर परिसरात दोन तरस स्पष्टपणे दिसल्याचे सांगितले. या घटनेनंतर नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली असून, रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे नागरिकांनी सांगितले.

दरम्यान, परिसरातील अनेक नागरिकांनी व्हॉट्सॲप तसेच इतर सोशल मीडिया माध्यमांवर तरस दिसल्याची माहिती, संदेश तसेच काही छायाचित्रे शेअर केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण अधिक वाढले असून, नागरिक एकमेकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहेत.
चोपडा शहर हे सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी व जंगलालगत असल्याने या परिसरात वन्यजीवांचा अधूनमधून वावर आढळतो. अन्न व पाण्याच्या शोधात तरसासारखे वन्य प्राणी मानवी वस्तीजवळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा घटनांकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.
स्वामीनारायण मंदिर परिसरात दररोज सकाळ-सायंकाळ भाविक, मॉर्निंग वॉक करणारे नागरिक, विद्यार्थी तसेच महिला मोठ्या संख्येने ये-जा करतात. अशा परिस्थितीत कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी वन विभागाने तात्काळ या परिसराची पाहणी करून जंगली प्राण्याचा मागोवा घ्यावा, आवश्यक त्या ठिकाणी पिंजरे लावावेत, रात्री गस्त वाढवावी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

विशेष म्हणजे, शहराच्या हद्दीत वन्य प्राण्यांचा वाढता वावर भविष्यात मनुष्यहानी अथवा पाळीव जनावरांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण करू शकतो. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्याची वाट न पाहता वन विभागाने त्वरित दखल घेऊन संबंधित जंगली प्राण्याला सुरक्षितरीत्या पकडून जंगलात सोडावे, अशी एकमुखी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
वन विभागाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने पाहणी करावी, नागरिकांमध्ये जनजागृती करावी आणि आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई करून परिसरातील भीतीचे वातावरण दूर करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.








