सचिन ओली, वर्धा दि. 14 : मागील दहा वर्षांपासून वैद्यकीय जनजागृती मंच व इंडियन रेडक्राँस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने पर्यावरणपूरक निर्मळ गणेश मूर्ती विसर्जन उपक्रम राबविला जात आहे. पहिल्या वर्षी दोन आकडी संख्येत विसर्जनाकरिता आलेल्या मुर्त्यांची संख्या मागील वर्षी 3800 इतकी होती. हा उपक्रम आता लोक चळवळ झाला असून, यंदाच्या विसर्जन सोहळ्याकरिता वैद्यकीय जनजागृती मंचाची संपूर्ण टीम सज्ज असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी आज आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. सचिन पावडे पुढे म्हणाले की, 10 वर्षांपूर्वी हा उपक्रम सुरू केला तेव्हा आम्ही घरोघरी जाऊन नागरिकांकडून पर्यावरणपूरक विसर्जनाकरीता मूर्ती घेत होतो. हा उपक्रम वर्ध्यात हळूहळू रुळला. हनुमान टेकडी ऑक्सिजन पार्क येथे सध्या दोन कुंड आणि तीन लहान कुंड आहेत. गेल्या काही वर्षांतील जनजागरणाने पीओपी मूर्तींची संख्या कमी झाली आहे. टेकडीवरील कुंडांमध्ये विसर्जित करण्यात येणा-या मूर्तींची माती संकलित करून ती पुन्हा कुंभारांना दिली जाते. या माध्यमातून पुढील वर्षी 200 ते 300 मूर्तींची निर्मिती केली जाते. तसेच येथे जमा होणा-या निर्माल्यापासून खत तयार केले जाते. या उपक्रमांतर्गत दीड दिवस ते दहा दिवसांच्या गणपती उत्सवाच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते. त्यानुसार विसर्जनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या कुंडांमध्ये चार फुटांपर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन यापूर्वी झाले आहे. टेकडीवरती माजी विधान परिषद आमदार रामदास आंबटकर यांच्या निधीतून सभामंडप बांधण्यात आल्याने या आयोजनाला हातभार लागला असल्याचेही डॉ. पावडे यांनी सांगितले.
महाआरतीचे आयोजन
मंगळवारी 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असून यादिवशी सर्वाधिक मूर्तींचे विसर्जन होणार आहे. यानिमित्त सायंकाळी 5 वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्याला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी या उपक्रमास मदत करणाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

धाम नदीवरील भार कमी
‘व्हीजेएम’च्या उपक्रमाला तसेच जनजागरणाला उत्तम प्रतिसाद मिळाल्याने पवनार येथील धाम नदीत विसर्जनाकरिता होणारी गर्दी बरीचशी ओसरली आहे. नागरिक धाम नदी परिसरात न जाता व्हीजेएमच्या टेकडीवरील कुंडात मूर्ती विसर्जनाला प्राधान्य देऊ लागले. ‘व्हीजेएम’च्या उपक्रमापासून प्रेरणा घेत अनेक सामाजिक संघटना-संस्था, नगरपालिकेनेही पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जनाला चालना दिली. आज नागरिक स्वतःच्या घरीही कृत्रिम कुंडात मूर्ती विसर्जित करतात.








