टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 29 – बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांच्या मनाची पकड मोबाईल आणि समाज माध्यमांनी घेतली आहे. त्यातून समोर येणाऱ्या माहितीनुसारच त्यांची मने घडत आहे. परंतु देश आणि समाजाच्या भल्यासाठी आजच्या विद्यार्थ्यांनी श्याम समजून घेतला पाहिजे व तोच श्याम त्यांचा आदर्श असावा. आताच्या पिढीला श्याम आणि त्याची आई समजण्यासाठी प्रत्येक शाळेने ‘श्यामची आई’ हे पुस्तक विद्यार्थ्यांना वाचायला दिले पाहिजे, असे प्रतिपादन धुळे येथील जयहिंद कॉलेजच्या निवृत्त उपप्राचार्य वत्सला चौधरी यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून केले.

साने गुरुजींच्या १२५ व्या जयंती निमित्ताने येथील कस्तुरबा माध्यमिक विद्यालय व महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयातर्फे आयोजित कार्यक्रम प्रसंगी त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत होत्या. यावेळी मंचावर चहार्डी येथील शा. शि. पाटील माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक एम. सी. पाटील, आर्ष पब्लिकेशन पुणेचे प्रा. दिलीप चव्हाण, जळगाव येथील डॉ. सोनाली महाजन, कस्तुरबा विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नीलकंठ सोनवणे, महिला मंडळ शाळेचे संजय बारी, मामलदे विद्यालयाचे रोहिदास सोनवणे हे उपस्थित होते. ह्या प्रसंगी निवडक विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात १०० विद्यार्थ्यांना ‘श्यामची आई’ हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, श्यामला जगाने भित्रा म्हणू नये म्हणून आईने कठोर होत त्याला पोहायला शिकविले. मनाला घाण लागू नये म्हणून जपायला शिकवले. श्यामने मातृभूमी आणि आपल्या जन्मदात्री मातेच्या संस्कारांचा आयुष्यभर अनुनय केला. साने गुरुजींनी विद्यार्थी, शेतकरी, सामान्य माणसाला न्याय मिळावा म्हणून लढा दिला. त्यांची ग्रंथसंपदा विपुल आहे. विद्यार्थी व शिक्षकांनी त्यांचे विचार वाचुन आत्मसात केले पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी तर वक्त्यांचा परिचय मुख्याध्यापक नीलकंठ सोनवणे यांनी व सुत्रसंचलन विनोद पाटील यांनी केले. कस्तुरबा विद्यालयातील या कार्यक्रमास दोन्ही शाळेतील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 243