टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 08 : वेगावर नियंत्रण मिळविण्याबरोबरच सुरक्षित प्रवास, वाहतुक नियमांचे काटेकोरपणे पालन व नियम पालनाचा दृढनिश्चय हा संकल्प प्रत्येकाने केल्यास रस्ते अपघात कमी करण्यात आपण निश्चित यशस्वी होऊ असे, प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी केले.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्यावतीने न्यु आर्टस, कॉमर्स कॉलेज येथे दि. 1 ते 31 जानेवारी या कालावधीत आयोजित राज्य रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ, महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाचे विभागीय अधिकारी श्री. उजवणे, प्राचार्य डॉ. सासनकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, उपअभियंता महेश मोकलकर आदी उपस्थित होते.

लोकशाही मध्ये आपल्याला असलेल्या अधिकारा सोबतच इतरांना सुध्दा अधिकार आहे. त्यामुळे आपले हित जोपासन्यासोबतच इतरांचे सुध्दा हित जोपासणे महत्वाचे असून रस्त्यावर वाहन चालवितांना काळजीपुर्वक वाहन चालविणे नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे. वाहतुक नियमानुसार वाहन चालवून आपल्यासोबतच समाजाची काळजी घेणे महत्वाचे आहे, असे पुढे बोलतांना श्री. फुलझेले म्हणाले. आयुष्य हे अमुल्य आहे युवा ही देशाची ऊर्जा आहे ही ऊर्जा समाजाच्या कल्याणासाठी परावर्तीत करण्याचे ध्येय ठेऊन युवकांनी काम करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
आयुष्याचा प्रत्येक क्षण हा अमुल्य असतो. त्यामुळे वाहन चालवितांना वेगावर मर्यादा ठेवून वाहन चालवावे. समोरच्या वाहनाशी स्पर्धा करुन आपल्या सोबत दुर-यांचा जीव धोक्यात येणार नाही याची काळजी आजच्या युवा पिढींनी घ्यावी, असे आवाहन जितीन रहमान यांनी केले.
मानवी जीवन अमुल्य आहे. जीवनाचा आनंद घेण्यासाठी वाहन चालवितांना आपल्यासोबतच कुंटूंबांचा व इतर समाजाचा विचार करुन वाहतुकीच्या नियमांचा वापर करुन वाहन चालवावे. यासाठी वाहन चालवितांना मद्य प्राशन करुन वाहन चालवू नये, वाहनाच्या वेग मर्यादेवर नियंत्रण ठेवावे, दूचाकी वाहनचालकांनी हेल्मेटचा वापर करावा, वाहन हाताळण्यापुर्वी वाहन सुस्थितीत असल्याची खात्री करुन घेऊनच वाहनाचा वापर करावा, असे अनुराग जैन म्हणाले.
स्नेहा मेढे यांनी प्रास्ताविकातून जिल्ह्यात मागील वर्षी 32 टक्के अपघात कमी झाल्याचे सांगून रस्ता अपघातात दोषी आढळल्या कारणाने 200 वाहन धारकांचे परवाने रद्द करण्यात असल्याची दिली. या कार्यक्रमात उपस्थितांनी रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्याची शपथ घेतली.
सुरक्षित प्रवास, वेगावर नियंत्रण आणि नियमांचे पालन ही त्रिसूत्री प्रत्येकाने अंगिकारल्यास अपघातात होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी हातभार लागेल असे मत सतिश अंभोरे व विवेक देशमुख यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. तत्पुर्वी वाहतुक नियमाच्या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहा मेढे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन व आभार सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक राहुल ढोबळे यांनी मानले. कार्यक्रमाला मोटारवाहन निरिक्षक अजय चौधरी, संदीप मुखे, मेघल अनासाने, साधना कवळे, प्रफुल्ल मेश्राम, सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक अमर पखान, विशाल भगत, आदित्य ढोक, अक्षय मालवे, उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व कर्मचारी, न्यु आर्टस कॉलेज येथील विद्याथी, कर्मचारी, प्राध्यापक मोठया संख्येने उपस्थित होते.








