टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 01 (सचिन ओली) : दिव्यांग व्यक्तींमध्ये प्रेरणा निर्माण करण्याच्या उद्देशाने केळझर येथील गोपाल बाबुराव पवार यांनी वर्धा ते अयोध्या असा तब्बल 900 किलोमीटरचा सायकल प्रवास सुरू केला आहे. त्यांच्या या अद्वितीय उपक्रमासाठी लायन्स क्लब गांधी सिटी, बजरंग दल, प्रहार दिव्यांग संस्था यांनी आर्थिक मदत दिली. तसेच यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांनी सुद्धा त्यांना यावेळी पाठिंबा दर्शविला आहे.

नारायण सेवा संस्थान उदयपूर, तसेच लायन्स क्लब गांधी सिटी यांनी घेतलेल्या कृत्रिम लिंब शिबिरामध्ये त्यांना हा कृत्रिम पाय बसवण्यात आला होता. तीनदा नॅशनल, एकदा इंटरनॅशनल, तसेच जिल्हास्तरीय अनेक स्पर्धेमध्ये गोपाल पवार यापूर्वी सहभागी झाले आहेत. याआधी त्यांनी केळझर ते शेगाव असा 350 किलोमीटरचा प्रवास सुद्धा केला आहे. त्यांनी दिनांक 31 जानेवारी रोजी वर्ध्यातील गांधी पुतळा येथून प्रस्थान केले.

याप्रसंगी लायन्स क्लब गांधी सिटीचे अध्यक्ष आशिष पोहाणे, डायरेक्टर अनिल नरेडी, संदीप चिचाटे, चंद्रकांत डगवार, मनोज तेलहांडे, प्रमोद वाघ, राष्ट्रीय बजरंग दलचे विदर्भ प्रांतीय अध्यक्ष अनुप जैस्वाल, तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनवणे व शिक्षण विस्तार अधिकारी जया परमार आदीसह इतर दिव्याग बांधव यांच्या उपस्थितीत या प्रवासाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. त्यांच्या या उपक्रमाला संपूर्ण समाजाकडून शुभेच्छा दिल्या जात असून, ते यशस्वीरीत्या आपल्या ध्येयापर्यंत पोहोचावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








