टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच एकूणच अस्सलता व परिणामकारकता या निकषांवर खरा उतरलेल्या चोपडा येथील ज्येष्ठ कवी अशोक नीलकंठ सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ या काव्यसंग्रहाला नाशिक येथील ‘मातोश्री स्व. दगूबाई बापूराव उगले पहिला स्मृती काव्य पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे.

येत्या २७ सप्टेंबर रोजी हुतात्मा स्मारक, नाशिक येथे सकाळी ११.३० वाजता ह. भ. प. बापूराव महाराज उगले यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. नाशिक येथील कवी राजेंद्र उगले तथा राऊ यांनी याबाबतची माहिती दिली. राज्यभरातील ४४ कवींच्या काव्यसंग्रहांमधून साहित्यिक विवेक चिंतामण उगलमुगले आणि जयश्री अनिलराव वाघ यांनी अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ या काव्यसंग्रहाची पुरस्कारासाठी निवड केली आहे.
यापूर्वी या काव्यसंग्रहाला डोंबिवलीच्या काव्य रसिक मंडळाचा ‘अनिल साठ्ये पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. अशोक सोनवणे यांची ही १४ वी साहित्यकृती असून, हा त्यांचा चौथा प्रौढ काव्यसंग्रह आहे.

अशोक सोनवणे हे चोपडा येथील प्रताप विद्या मंदिराचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून, त्यांना यापूर्वी अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चोपडा शाखेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे अशोक सोनवणे यांच्या साहित्यिक कार्याचा गौरव झाला असून, या निमित्ताने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.













