टिम लोकप्रवाह, चोपडा | दि. २५ ऑगस्ट : शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत रेशन कार्डवरील लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया सुरू असून, चोपडा तालुक्यात तब्बल ४२ हजार ५६७ लाभार्थी सदस्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे. संबंधित लाभार्थ्यांनी कोणताही विलंब न करता ३१ ऑगस्ट २०२६ पूर्वी ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे. चोपडा तालुक्यात सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी (PHH) योजनेतील १ लाख ८२ हजार ५८८, तर अंत्योदय अन्न योजना (AAY) अंतर्गत ४० हजार ८०२ सदस्य आहेत. या दोन्ही योजनांतील एकूण २ लाख २३ हजार ३९० लाभार्थी सदस्यांपैकी ४२ हजार ५६७ सदस्यांची ई-केवायसी अद्याप बाकी आहे.

मुदतीनंतर नावे वगळली जाऊ शकतात
३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या लाभार्थी सदस्यांना शासनाच्या नियमानुसार अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र मानले जाऊ शकते. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांची नावे लाभार्थी यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतिम मुदतीपूर्वी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.

शासकीय कर्मचारी व जास्त उत्पन्न असलेल्यांचीही पडताळणी
दरम्यान, सार्वजनिक वितरण प्रणालीचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांमध्ये शासकीय नोकरी करणारे, शासनाने निश्चित केलेल्या निकषांपेक्षा अधिक उत्पन्न असलेले तसेच कंपनीधारक किंवा पात्रता निकषात न बसणारे लाभार्थी यांचीही पात्रता पडताळणी सुरू करण्यात आली आहे.
संबंधित लाभार्थ्यांनी आपली माहिती व पात्रता ३ सप्टेंबर २०२६ पर्यंत पडताळून घ्यावी. शासनाच्या निकषांनुसार अपात्र आढळणाऱ्या लाभार्थ्यांची नावे अन्नसुरक्षा योजनेच्या यादीतून नियमानुसार वगळण्यात येणार आहेत.
घरबसल्या ‘मेरा eKYC’ ॲपद्वारेही सुविधा
लाभार्थ्यांना संबंधित रास्त भाव दुकानातील e-POS मशीनद्वारे ई-केवायसी करता येणार आहे. तसेच ‘मेरा eKYC’ ॲप डाउनलोड करून घरबसल्या विहित मुदतीत ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
ई-केवायसी किंवा पात्रता पडताळणीसाठी कोणत्याही अनधिकृत व्यक्ती अथवा एजंटकडे कागदपत्रे देऊ नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. रास्त भाव दुकानदारांनीही आपल्या दुकानाशी संलग्न असलेल्या प्रलंबित लाभार्थ्यांना याबाबत माहिती देऊन ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी आवश्यक सहकार्य करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.













