ढिसाळ नियोजनामुळे शहरवासिय करताय पाणीटंचाईचा सामना; नगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागाचा ढिम्म कारभार
लोकप्रवाह, चोपडा दि. १२ जून – येथील नगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अगोदर सहा दिवसांआड होणारा पाणीपुरवठा हळूहळू सात, आठ आता तर चक्क नऊ दिवसांआड येत असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दोन दिवसांआड पाणीपुरवठा होणार अशी घोषणा नगरपालिकेमार्फत करण्यात आली होती हे विशेष !
“दोन दिवसांआड होणार पाणीपुरवठा” ही घोषणा हवेतच ..! अमृतयोजनेचा अमृतलाभ शहरवासियांना होणार कधी ?
पाणीपुरवठा विभागामार्फत शहरवासियांना पाणी पुरवठ्यासंबंधी कुठलीही पुर्वसुचना दिल्या जात नाही, तसेच पाणी पुरवठा विभागप्रमुख अभियंता व कर्मचारी यांना कॉल केला तर त्यांच्याद्वारे फोन उचलल्या जात नाही. मग सर्वसामान्य जनतेने काय करावे हा प्रश्न उपस्थित होत आहे.
दिवसेंदिवस ढासळत चाललेल्या पाणीपुरवठ्यासंबंधी स्वतः मुख्याधिकारी यांनी लक्ष द्यावे हिच शहरवासियांची अपेक्षा आहे.
आता पावसाळ्याची सुरुवात झाली आहे. त्यामुळे महावितरणच्या विजेचा लपंडाव सुद्धा सुरु होणार हे नक्की.. म्हणून विज नसल्यास ही समस्या येणारच त्यामुळे ठोस उपाययोजना कराव्यात.
“एक्सप्रेस फिडरच्या” माध्यमातुन ही समस्या कायमस्वरुपी निकाली निघु शकते. मात्र याला प्रशासकीय सोबतच राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे.








